जयंत पवारांच्या लेखनाशी दिग्दर्शक महेश मांजरेकर अप्रामाणिक!
.....
जयंत पवार स्मृती संमेलनाध्यक्ष
अभिनेते अनिल गवस यांचे मत
....
संमेलनाला मुंबई, पुणे, गोवा रत्नागिरी, कोल्हापूर भागातून रसिकांची उपस्थिती
मालवण/प्रतिनिधी : जयंत पवार हे नाटककार आणि लेखक म्हणून समूहाचे लेखक होते. त्यांनी व्यक्तीपेक्षा समूहाचे हित बघितले. त्यांच्या ' अधांतर ' नाटकाने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. मात्र याच नाटकावर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी निर्मिती केलेला "लालबाग परळ", हा सिनेमा चांगला बनवला नाही. चित्रपटाची व्यावसायिक गणिते घालून या मूळ नाटकाच्या संहितेत बदल केला गेल्यामुळे तो उत्तम चित्रपट निघू शकला नाही. यामुळे जयंत यांच्या नाट्य लेखनाशी मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत. पण, असे असले तरी त्यांनी मराठीतील अनेक मुलांना हिंदीत चित्रपटात काम दिल्याचा आपल्याला अभिमान आहे ,असे स्पष्ट प्रतिपादन जयंत पवार स्मृती संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस यांनी केले.
नाटककार, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार स्मृती संमेलन समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी, विलास कोळपे यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेते गवस यांनी महेश मांजरेकर हे फिल्मी आहेत, ते व्यवसाय बघतात त्यानुसार ते मूळ लेखनात बदल करतात. त्यामुळे अधांतर नाटक आणि त्यावरचा सिनेमा यात फरक राहिला. नाटका एवढा सिनेमा चांगला झाला नाही, असेही गवस यांनी सांगितले.
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर यांनी पाब्लो नेरोदा यांची कविता वाचन करून संमेलनाचे उद्घघाटन केले. यावेळी मंचावर
संमेलनातील व्याख्याते समीक्षक डॉ दत्ता घोलप, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय कांडर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे आदी उपस्थित होते.संमेलनाला मुंबई पुणे,कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी आदी भागातून रसिक उपस्थित होते.
अनिल गवस म्हणाले, जयंत यांचं लेखन जगले तरच अभिनय करता येतो. जयंत यांचे अंधांतर नंतरच सगळ्यात महत्वाचे नाटक म्हणजे काय ' डेंजर वारा सुटला '! जयंत यांना लोकाश्रय खूप मिळाला, पण ते राजाश्रयापासून दूर राहिले. लेखक आणि अभिनेत्यानेही समाजाचा भाग व्हायला पाहिजे.जबाबदार नागरिक बनायला पाहिजे. नटाने आणि लेखकाने आपल्या भूमिकेशी ठाम असायला हवे. जयंत हे कायम आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. त्यांनी दुसऱ्याच्या ऐकण्यालाही महत्त्व दिले. पण, स्वतःच्या लिहिण्याला अधिक महत्व दिले.जयंत हे संयमाचे महामेरू होते. जयंत यांची दोन नाटके अप्रकाशित आहेत. ही नाटके रंगमंचावर येण्यासाठी लोकवर्गणी काढली जावी आणि त्याचे मोफत प्रयोग केले जावेत. लक्ष्मीची खानावळ हे त्यांचे अप्रकाशित अप्रतिम नाटक आहे.जयंत यांचा परदेशी नाटकाचाही अभ्यास होता.
त्यांनी सगळ्यांच्या नजरेतून समीक्षक म्हणून नाटक बघितले. त्यांनी कधीही समीक्षक म्हणून नाटकाला झोडले नाही.त्यांच्या नाट्य समीक्षेने नाटक चालण्याला बळ दिले. डेंजर वारा या नाटकाला किणी प्रकरणाचा संदर्भ असल्याने ते नाटक रंगमंचावर आणण्याचे कोणी धाडस केले नाही.
*जयंत पवार स्मृती संमेलने महाराष्ट्रभर व्हावी*
आपल्या व्याख्यानात डॉ.दत्ता घोलप म्हणाले, जयंत पवार यांनी एकूण भारतीय साहित्यातील श्रेष्ठ दर्जाची कथा लिहिली आहे. मराठी कथेचा अवकाश विस्तारण्याचे काम त्यांनी केले. भूमिका घेणारा आणि लेखकपणाचं मूल्य जाणणारा समकाळातील महत्त्वाचा लेखक आहे. जयंत पवार स्मृती संमेलन हे त्यांच्या साहित्य विचारांचा जागर करणारे संमेलन आहे. अशी संमेलने संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला हवीत. यावेळी अजय कांडर यांनी जयंत यांच्या कथा, नाटक यासंबंधी विचार व्यक्त केले.
चंद्रकांत बाबर यांच्या ॲमेझॉन वरील पुस्तक मागणीसाठी खालील लिंकचा वापर करा
https://www.amazon.in/dp/B0FCM5XRKT
https://www.amazon.in/dp/B0FCM72XPD
https://www.amazon.in/dp/B0FCM6BWHY


Post a Comment
0 Comments